सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटलांची तुफान टोलेबाजी, अजित पवार गटाला टोला

आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही, अशी तुफान टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. नगर -दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

कोणत्या विचारामागे राहून आपण काम करतोय हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठय़ा ताकदीने उभे आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हेच देशाची परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले.

एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि…

आज टीव्हीद्वारे जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. सर्वत्र सत्ताधारीच दिसतील अशी व्यवस्था केली जात आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असेल तर विचार करा यांची मिळकत किती असेल? या सरकारने इलेक्टोरल बॉण्ड्स नावाची व्यवस्था मध्यंतरी सुरू केली. विविध संस्थांच्या माध्यमातून यांनी पैसे घेतले त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. लोक कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व व्यवहार जाहीर करा. हे जाहीर झाल्यावर कळले की निम्म्याहून अधिक पैसे हे भाजपला मिळाले आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर ईडी, आयटी या संस्थांद्वारे कारवाई सुरू होती. पैसे दिले तेव्हा सुटका झाली. हा उघड उघड भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार कसा करावा याची नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रकार मागच्या पाच वर्षांत झाला. एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैंही खाऊंगा’ असे केले जात आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Lok Sabha Election 2024 – महायुतीत वादाची ठिणगी, बुलढाण्यातून भाजप नेत्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

10 वर्षाचा हिशोब द्या

टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून काँग्रेसने 70 वर्षांत काय केले नाही हे सांगितले जात आहे. हे 10 वर्षे सत्तेत आहेत, यांनी 10 वर्षात काय केले याचीही एखादी जाहिरात करा. 70 वर्षांत काम केले म्हणून देश आज इथपर्यंत आला आहे. मागच्या 10 वर्षात यांनी देश अधोगतीकडे नेला. आज देशातील तरुणांना रोजगार नाही. पीएचडी झालेली मुले आज शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरत आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपल्या देशाचा नंबर 111 वा लागतो. भाजप यावर उत्तर देईल का? का देश पुढे गेला नाही? यांचे उत्तर काय असेल तर तुम्ही साठ वर्षात काय केले? आम्ही फक्त 10 वर्षांचा हिशोब मागतोय तर यांची ही परिस्थिती आहे. टीव्हीवर जे दाखवले जाते ते फक्त दिसायला चांगलं आहे, खरी परिस्थिती तुम्ही आम्ही भोगतोय असे ते म्हणाले.

देश हुकुमशाहीने चालवण्याचा भाजपचा निर्धार, जनतेचा महाभयंकर उद्रेक होईल! – विजय वडेट्टीवार