नरेंद्र मोदी बिथरलेयत, त्यामुळे मॅच फिक्सिंग सुरू आहे; जितेंद्र आव्हाड यांची टीका

गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश दलाल यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला फटकारले आहे. ”लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या. सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती. हे ‘मॅच फिक्सिंग’ आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत. उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं ‘400 पार’चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.