लग्नाच्या 8व्या दिवशी दागिने पळविण्याचा कट, नववधूसह टोळीला पोलिसांनी केले अटक

भराडी तालुका आंबेगाव येथे लग्नाचा बनाव करून लग्नाच्या अवघ्या आठ दिवसातच पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नववधूसह टोळीला पारगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. याप्रकरणी नववधूसह एक महिला दोन पुरुष यांना ताब्यात घेतले आहे. एकूण सहा जणांविरुद्ध पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करणार आहेत. याहीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात या भराडी या गावात याच प्रकारे फसवणूक होऊन मंचर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली होती

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार व गणेश खंडू बांगर ( रा. भराडी ता. आंबेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश बांगर यांच्या वडिलांनी ओळखीचे वसंत किसन थोरात (रा. मंचर ) यांना गणेश साठी लग्नाला मुलगी बघण्यास सांगितले दि. 22 डिसेंबर रोजी वसंत थोरात हे एक पुरूष व तीन महिलासह भराडी येथे आले गणेश बांगर यांच्या घरात मुलगा मुलगी पहाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्न जमवण्याची बैठक घेतली. मुलगी शीतल ही अनाथ असून तिचा सांभाळ आम्ही केला असून लग्न जमविण्यासाठी मुलीकडील लोकांना दीड लाख रुपये द्यावे लागतील असे मध्यस्थाने सांगितले. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने बांगर कुटुंबानेही एक लाख 30 हजार रुपये देण्याचे कबूल केले. पौष महिना लागत असल्याने त्याच दिवशी सायंकाळी मुलगा गणेश व मुलगी शीतल यांचे घरातच हार घालून घरगुती लग्न लावले. मुलाचे वडील यांनी नातेवाईकडून एक लाख रुपये उसने घेऊन व स्वत:कडील 30 हजार रुपये असे एकूण 01 लाख 30 हजार रुपये मध्यस्थाला दिले. दुसऱ्या दिवशी दि.23 रोजी मंचर येथील एका मंगल कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून वकिलांकडे नोटरीही करण्यात आली. नववधू शीतल हिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे मुलगा गणेश याच्या मोबाईल वरून ती तिची मावशी बरोबर बोलत होती. शीतल हिचे वागणे संशास्पद वाटल्याने मुलगा गणेश याने मोबाईल मध्ये रेकार्डिंग सुरु केले.

मुलगी शीतल ही नातेवाईकांबरोबर बोलत असताना लग्नाची पूजा झाल्यानंतर दागिने घेऊन गुजरातला पळून जाण्याचा कट रचत असल्याचे मोबाईल मध्ये रेकार्डिंगवरून समजले. त्यानंतर गणेश बांगर यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. नववधू शीतल ही काल शुक्रवार 30 डिसेंबर रोजी मंचर येथील संभाजी चौक येथे नातेवाईकांना भेटायला गेली असता, पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार देवानंद किर्वे, अविनाश कालेकर,चंद्रकांत गव्हाणे, श्यामल तळेकर, निशा गुळवे असे सर्वजण संभाजी चौकात साफळा रचून थांबले असता मुलगी शितल रमेश खुडे हिला भेटण्यासाठी एक महीला व एक पुरुष आले. ते सदर ठिकाणी आपापसात काहीतरी बोलत होते. पोलीस आरोपींच्या दिशेने चालत जावु लागले असता आरोपींना संशय आल्यामुळे ते तेथुन पळुन जावु लागले. पोलिसांनी २० मीटर पळत जाऊन त्यांना पकडले. लता अविनाश कोटलवार ( 51) मनोज अविनाश कोटलवार ( वय 24 वर्षे सध्या रा इंदीरानगर, आळंदी ता. खेड, मुळ रा. नांदेड) असल्याचे समजुन त्याचाही नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच नववधू शितल रमेश खुडे हीच्याकडे अधिक तपास केला असता तिचे खरे नाव यास्मीन अन्वर बेग (वय 27 वर्षे, रा. डी बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे) असे असल्याचे तीने सांगितले. तिचाही नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाले. या तिघांना अटक करण्यात आली रात्री उशिरा खेड तालुक्यातील वेताळे येथून गणपत हांबु वाळुंज याला अटक केली. त्याच बरोबर वसंत किसन थोरात (रा मंचर ता आंबेगाव ), वैशाली मोरे रा पुणे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.