नात्यांचा गोडवा

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’  मालिकेत रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे. यामध्ये बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ‘रमा राघव’ ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. स्वार्थी आई, त्यात वडिलांनी केलेली दोन लग्नं यामुळे बिघडलेली, नातेसंबंधावरचा विश्वास उडालेली रमा ते पुरोहित घरातल्या वातावरणाने बदललेली, सगळय़ांचा विचार करणारी रमा हा टप्पा प्रेक्षकांना चकीत करणारा ठरला आहे. एक पुढची पायरी गाठत रमाने तिची सावत्र बहीण आरुषीसोबत बहीण म्हणून छान नाते फुलवले आहे. या नात्यालाच यंदाच्या रक्षाबंधन सोहळय़ात एक लोभसवाणे वळण मिळणार असून रमाच्या आग्रहातून छोटी बहीण आरुषी, मोठी बहीण रमाला राखी बांधणार आहे. रमा तिच्या रक्षणाचे वचन देते.