घड्याळ तात्पुरतं अन् वेळ वाईट! सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचाच उल्लेख करत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अजित पवार गटाला डिवचले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाला ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाचा वापर करताना यासंदर्भातील प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याचे ठळकपणे त्याखाली नमूद करावे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकी दरम्यान घड्याळ चिन्हाचा सर्रासपणे वापर सुरू आहे. यावरून आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका, असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावले. यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे.

हे वाचा – भाजपचे वॉशिंग मशीन… 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 बड्या नेत्यांना अभय

‘घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल’, असा स्पष्ट उल्लेख प्रचार साहित्यात करण्याचा सज्जड दम ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार! अजितदादा मित्र मंडळाने आता नवीन टॅग लाईन वापरावी, ‘घड्याळतात्पुरतं अन् वेळ वाईट’, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घडय़ाळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. 19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘घडय़ाळ’ चिन्ह व राष्ट्रवादी कॉँग्रेस या नावाचा निवडणुकीत वापर करताना याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करा. तसेच प्रचार साहित्यातदेखील तसे ठळकपणे नमूद करा, असे निर्देश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या या निर्देशांचे अजित पवार गटाकडून योग्य प्रकारे पालन केले जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करून करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून न्यायालयाच्या निर्देशांचे कशा प्रकारे उल्लंघन सुरू हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. आम्ही दिलेले आदेश हे अत्यंत सोप्या भाषेत आहेत. त्याचा चुकीचा अथवा दुहेरी अर्थ लावण्यात येऊ नये, असे स्पष्ट करत 19 मार्चच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

पंतप्रधानांपासून तपास यंत्रणांपर्यंत सर्वांचा अजित पवारांवर वरदहस्त