…हा विदुषकपणा नाही तर काय आहे? छगन भुजबळ यांचे जरांगेना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाचा विषय तापला असतानाच छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण आणखी तापत आहे. छगन भुजबळ विदुषकपणा करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत छगन भुजबळ यांनी जरांगे यांनाच टोला लगावला आहे. माझ्यावर हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांवर हल्ले झाले, 17 महिला पोलिसांवर हल्ले झाले आहेत तिथे माझं काय घेऊन बसलात? पोलीस हतबल झाले आहेत. त्यांना आपण विश्वास देणे आवश्यक आहे की तुमच्या पाठिशी सरकार आणि जनता आहे. आंतरवाली सराटी या ठिकाणी 70 पोलीस जखमी झाले. छगन भुजबळांनी पाहुण्याचं हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांना मारलं असं ते सांगत आहेत. हा विदुषकपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत भुजबळ यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे समितीला कुणबी नोंदी तपासण्याचं काम दिलं गेलं होतं. त्यामुळे तेव्हा शिंदे समितीला कुणबी नोंदणी तपासण्यासाठी आमची काही हरकत नव्हती. त्यांचं काम संपलं आहे, ती समिती आता बरखास्त करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सरसकट कुणबी अशी जी मागणी आहे त्याला आम्ही समर्थन करत नाही यापुढेही करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षण देऊ शकत नाही असं म्हटलं आहे. मराठा समाजाला वाढवून आरक्षण द्यायचं तर द्यावं आमची काहीच हरकत नाही, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आता काही लोक कुणबींमध्येच आम्हाला आरक्षण हवंय असा आग्रह होतो आहे. हा आम्हाला मुळीच मान्य नाही आणि तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. मराठवाड्यात जर निजाम काळातल्या नोंदी सापडल्या त्यात कुणबी उल्लेख असेल तर ते आपोआपच कुणबी आणि ओबीसी होतीलच. त्यानंतर जात पडताळणीचाच विषय राहतो. जे खरे कुणबी आहेत त्यांना घ्या आमची काही हरकत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही कागदपत्रं पाठवली. पेनाने कुणबी लिहिलं जातं आहे आम्ही त्याचाच विरोध करतो आहोत.