जे वचन देतो, ते पूर्ण करतो! कोस्टल रोड उद्धघाटनावरून उद्धव ठाकरेंचा षटकार

येत्या 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या सागरी सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सागरी सेतूचे भूमीपूजन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते झाले होते. त्याबाबत म्हसळा शहरात झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ”मी जे वचन देतो ते पूर्ण करतो… याची साक्ष आता पंतप्रधान देतील’, असा जबरदस्त टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

”आज जो वांद्रे वरळी लिंक रोड आहे त्याचे भूमीपूजन 1995 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रात आपलं सरकार होतं. त्यानंतर सरकार गेलं व तो पूल जेव्हा तयार झाला त्याचे उद्घाटन करायला सोनिया गांधी आल्या होत्या. तसंच वरळी ते नरिमन पॉईंट ह्या सागरी महामार्गाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान 19 तारखेला येताहेत. म्हणजे एक गोष्ट चांगली झाली, उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो; याला साक्ष आता देशाचे पंतप्रधान असणार आहेत. याचा मला अभिमान आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.