जालन्यात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; शिक्षकांच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भरवली शाळा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच सोमवारी शाळा भरवली. जिल्हाधिकारी प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दालनात बोलवून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरवावी लागल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या 600 हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यातच आहेत त्या शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याविषयी पालकांनी प्रशासनाला अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरवली आणि निदर्शने केली. शिक्षकांच्या रिक्त जागा लवकर भरण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहे.

जिल्ह्यात 600 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असताना कार्यालयीन कामासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा गुणवत्तेवर देखील गंभीर परिणाम होत आहे. तरीदेखील जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. जिल्ह्यात शिक्षकांचे 600 हून अधिक पदे रिक्त असताना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक, शालार्थ समन्वयक, गट समन्वयक या पदावर शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत नसल्याने पटसंख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक द्यावा,या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरली असून जिल्हाधिकार्‍यांनीच विद्यार्थ्यांना शिकवावे, जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही असा पवित्रा घेतला आहे.