मणिपूरला महिलांची विवस्त्र धिंड आणि बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात न्यायाधारकडून निदर्शने

मणिपूर राज्यात तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा महिला वकिलांद्वारे संचलित न्यायाधार संस्थेच्या वतीने शहरात निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार, या अराजकतेस जबाबदार असलेल्या केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेचा धिक्कार नोंदवून मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली, तर मणिपूर सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा ॲड. निर्मला चौधरी, कार्मेल कॉन्व्हेंट सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. शिंगी गोरगे, प्राचार्या निशा जोसेफ, उर्जिता फाऊंडेशनच्या संध्या मेढे, ॲड. निशा शिवूरकर, प्रा. शिवाजी गायकवाड, भाकपचे कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. सतीश पवार, आपचे राजेंद्र कर्डिले, अर्शद शेख, बहिरनाथ वाकळे, महेबुब सय्यद, शबाना शेख, कन्हैया बुंदेले, ॲड. स्नेहल चव्हाण, आशाताई चव्हाण, सुमन कालापहाड, छाया कोरडे, शकुंतला लोखंडे, ॲड. नीलिमा भंणगे, ॲड. दीक्षा बनसोडे, मीनाक्षी जाधव, दिलीप घुले, ॲड. प्रणिता मकासरे, निशा जोसेफ, मनीषा साळवी, हमीद शेख, विद्या तन्वर आदींसह विविध क्षेत्रातील महिला, डाव्या चळवळीतील पक्ष व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मणिपूरमध्ये संघटित जमावाने दहशत निर्माण करण्याचा हेतूने तेथील तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तीन महिलांपैकी एक महिला अजूनही सापडलेली नाही. या महिलेचा शोध घ्यावा, मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार व महिलांवर होणारा अत्याचार थांबवा तेथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ॲड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, देशात महिलांबद्दल असलेली असंवेदनशीलता या घटनेवरून समोर आली आहे. केंद्र सरकारने देखील कठोर पाऊल उचलले नसल्याने महिला अत्याचाराला बळी पडत आहे. विवस्त्र धिंड काढून बलात्कार प्रकरण घडल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी फिर्याद नोंदविण्यात आली. ही दुर्देवी घटना राज्यघटना व लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. जेथे महिलांचे संरक्षण होत नाही, तेथे राज्यघटनेला अर्थ उरत नसल्याचे स्पष्ट करून या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, सरकार या घटनेवरून तातडीने कारवाई करत नसल्याने, ते एक प्रकारे या घटनेचा समर्थन करत आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान परदेशी दौरे करत असल्याची टिका त्यांनी केली. ॲड. निशा शिवूरकर यांनी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये शांतता निर्माण करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी. घडलेली घटना निंदनीय असून, पिडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशी मिळणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. कॉ. महेबुब सय्यद म्हणाले की, महिलांकडे पाहण्याचा भाजप सरकारचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे. बलात्कारींना पाठिशी घातले जात असल्याने या प्रकारच्या गंभीर घटना घडत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी व बलात्कारींना फाशी होण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.