कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी शिवारातील सावळीविहीर परिसरात तीन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तत्काळ या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रगतीशील शेतकरी मोहन गिरमे यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी शिवारातील सावळीविहीर शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस शेती, झाडांचे क्षेत्र व लहान-मोठे जलसाठे आहेत. त्यामुळे बिबट्याला येथे वास्तव्यासाठी आवश्यक ते लपनक्षेत्र आहे तसेच येथे हा रस्ता परिसरातील चार गावांनाही जोडला गेला आहे. त्यामुळे या भागात लोकवस्ती असल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिकांची या रस्त्याने ये-जा सुरू असते.
काल सोनेवाडी परिसरात या बिबट्याने आपला मोर्चा थेट गावातच वळवला. कैलास विठ्ठल गुडघे यांच्या गोठ्यातील एक शेळी या बिबट्याने फस्त केली, तर बोंडखळ वस्ती, जायपत्रे वस्ती, गिरमे वस्ती, फटांगरे वस्ती, राऊत वस्ती आदी परिसरात शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात हा बिबट्या दबा धरून बसतो. सध्या शेतकऱ्यांचे ऊस हांदून झाले असून उसामध्ये रानडुक्कर व प्राण्यांची संख्या वाढली आहे. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी हा बिबट्या या ऊस शेतीची ही मोठी नुकसान करत आहे . शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, कोंबड्या व रानडुकरांचा कर्दनकाळ म्हणून या बिबट्याने आपली दहशत केली.
वेळोवेळी ग्रामस्थांनी वन विभागाकडे या बिबट्यांना जेर बंद करण्यासाठी मागणी केली असता वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले. या बिबट्याच्या धास्तीने सोनेवाडी शिवारातील व्यावसायिक आपले दुकाने सातच्या आत बंद करून घरी येतात. त्यामुळे व्यवसायातही नुकसान होत असल्याचे गोरख लिपने यांनी सांगितले. वन विभागाने आता याकडे दुर्लक्ष न करता तातडीने सोनेवाडी सावळिविहीर शिवालगत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी मोहन गिरमे यांनी केली आहे.