कुडाळ पं.स.च्या वतीने आधुनिक शेती, दिडशे वनौंषधींची लागवड

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत चिखलधुणी हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अणाव – हुमरमळा येथे प्रक्षेत्रावर राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व दुसरी आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाणार आहे. नवीन पिढी मातीपासून दूर गेली. त्यांची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी हा यामागचा उदात्त हेतू आहे तसेच हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या 2 हेक्टर जागेत विविध अशा 150 वनौषधींचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बांबू व फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमांनी चिखलधुणी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

याबाबत बोलताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, पावसाळ्यात कोकणात प्रामुख्याने भात हे मुख्य पीक घेतले जाते, भात पिकालही सुधारित संकरित दाण आणि यांत्रिकीकरण यादवारे मोठी प्रगती झाली आहे शेतकरी कमीत कमी क्षेत्रात संकरित वाण व यांत्रिकीकरणाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत. पौष्टिकता आणि औषधीय गुणधर्माच्या उपलब्धतेमुळे आजही जुन्या पारंपारिक वाणाच्या भाताचे आहारातील महत्त्व वाढले आहे. भात शेती करणारा आपला बळीराजा किती कष्टाने शेती पिकवतो याची ओळख नोकरदार बंधू-भगिनींना व्हावी, शेतकऱ्यांबद्दल मनात आदरभाव निर्माण व्हावा जिला आपण माता संबोधतो त्या मातीशी संपर्क वाढावा म्हणून आम्ही पंचायत समिती कुडाळचे सर्व अधिकारी – कर्मचारी 26 जुलैला एक दिवस शेतकऱ्याच्या शेतात उतरून पारंपारिक पद्धतीने स्थानिक वाण आणि श्री पद्धतीने सुधारित वाणाच्या भात रोपांची लावणी करून शेतक-यांचा सन्मान करणार आहोत.

आयुर्वेदात असं म्हटलं की, ज्या भौगोलिक क्षेत्रात आपण राहतो तिथे होणाऱ्या आजाराचं औषध तिथल्याच मातीत रुजून येतं, म्हणजे त्या त्या भागातील वनौषधी तिथल्या भागात होणान्या आजारांवर उपचार ठरतात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या पिढीला या वनौषधींचे ज्ञान होते. म्हणूनच हा प्रकल्प साकारत आहोत, असे श्री.चव्हाण म्हणाले.

शेतकरी न्हानु पांडुरंग पालव यांच्या शेतावर हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकरी राजा नटून थटून शेताच्या बांधावर असणार आहे. यावेळी पूर्वी शेतात गाणी गाण्याची पद्धत होती तो गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गेले पंधरा दिवस सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, दत्ताराम आंबेरकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, गीता चेंदवणकर, धनश्री परब, समीरा केरकर, गणेश राठोड, महादेव खरात, प्रशासक संदेश परब, कांचन कदम आदींनी यासाठी मेहनत घेतली आहे. राज्यात अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम असेल असेही चव्हाण यांनी सांगितले. चिखलधुणी म्हणजे शेतकऱ्याचा आंनदोत्सव असून या सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा कृषी विकास अधिकारी जानबा झगडे, नरेगा गटविकास अधिकारी विरेश अंधारी, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.