आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, उद्या महाराष्ट्रही फोडतील! उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात एका गटाने राष्ट्रवादीवर दावा केला आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व असा गोंधळ उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ‘मातोश्री’वर भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपचे मनसुबे काय आहेत ते दाखवत त्यांच्यावर टीका केली.

‘महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्यामुळेच त्यांनी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली उद्या हे महाराष्ट्र फोडतील तेव्हा त्यांना विरोध करणारं कुणी नको आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सुरू आहेत. ही लढाई अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे’, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेना नको म्हणून शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला’.