मुंबईची वाढती तहान नवे गारगाई धरण भागवणार! दररोज 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणार

दिवसेंदिवस प्रचंड नागरी विकास होणाऱ्या मुंबईची वाढती तहान आता नवे प्रस्तावित गारगाई धरण भागवणार आहे. या धरणासाठी नाशिक धरण सुरक्षा संघटना आणि केंद्रीय वन विभागाकडून परवानगी मिळाली आहे. तर राज्याच्या वन विभागाची परवानगी लवकरच घेतली जाणार आहे. या धरणामुळे मुंबईला दररोज होणाऱ्या 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठय़ात 400 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मुंबईचा झपाटय़ाने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राधान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या 12/11/2013च्या निर्णयानुसार याआधीच परवानगीही मिळाली आहे. मात्र मनोरी येथील प्रस्तावित समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प आणि गारगाई प्रकल्पात लाखो झाडे बाधित होणार असल्यामुळे हा प्रकल्प बारगळला होता, मात्र आता पुन्हा या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

असा आहे गारगाई प्रकल्प
नियोजित गारगाई धरण प्रकल्प पालघर जिह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. यामध्ये 69 मीटर उंचीचे, 972 मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोऱयाचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे दोन किमी लांबीच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.

पिंजाळ, दमणगंगा प्रकल्पही प्रस्तावित
पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी गारगाईसह पिंजाळ आणि दमणगंगा असे एपूण तीन नवीन जल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या तीन प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी प्रतिदिन वाढीव 2891 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

पालिकेचा पैसा वाचणार, पुनर्रोपणाने झाडे वाचणार
गारगाई प्रकल्पामुळे एकूण 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे, मात्र या प्रकल्पातून मुंबईत पाणी आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज भासणार नाही. उपलब्ध असलेल्या यंत्रणेमधूनच हे पाणी मुंबईत आणले जाईल. मोडकसागर धरणाला जोडण्यासाठी केवळ दोन किमीचा बोगदा तयार करण्याचा खर्च येईल.

तर या ठिकाणच्या लाखो झाडांचे पुनर्रोपण करण्यात येतील. शिवाय या प्रकल्पात केवळ एकच संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. तर चार गावांतील शेतजमिनीला फटका बसणार आहे. या चार गावांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याने या जागीही झाडांची पुनर्रोपण, लागवड करणे शक्य होणार आहे.