निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा; बाळासाहेब थोरात यांची मागणी

मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली आहेत. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उरले सुरली पिकं आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पंचनामे, पाहणी निकष यात न पडता शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

थोरात यांनी बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांना भेट देत नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहिर, प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना आता झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. नाशिक जिल्हाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात 3 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, धान, कांदा, टोमॅटो, कांदा रोपवाटीका, ज्वारी, द्राक्षे यासह फळबागा गारपीटीने नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्याला आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारने पंचानामा, पाहणी, निकष याचे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत तात्काळ द्यावी, असे थोरात म्हणाले.

राज्यातील सरकारचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. खरीपाच्या हंगामात झालेल्या नुकसानीची सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळालेला नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत आहेत. पण शेतकऱ्यांना मदत देत नाहीत. सरकारने विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप लावून शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यास चालढकल केली तर हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा थोरात यांनी दिला.