तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; 70 संशयितांचा निकालही थांबवला

महाराष्ट्रात तलाठी भरती सुरुवातीपासून वादात सापडली असून, अद्यापही हे प्रकरण मिटलेले नाही. त्यामुळे पात्र- अपात्र लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे. तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यात राज्यात सर्काधिक 214 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे.

तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रांवरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय 70 संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत. तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली.