चंद्रपुरातील गोंडपिपरीतील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू; मृतदेह सापडले

sunk_drawn

क्रिकेट खेळत असताना चेंडू तलावात पडल्याने चेंडू आणण्यासाठी दोघं मित्र तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात घडली आहे. गौरव विलास ठाकूर ( 14 ), शौर्य भास्कर पिंपशेडे ( 15 ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने गोंडपिपरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती इतर मित्रांनी मृतांच्या माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाचा पाळीवर दोघांचे कपडे आढळून आले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. उशिरापर्यंत शोधमोहीम राबविला गेली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर बुधवारी पहाटेपासूनच मुलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यात पोलिसांना यश आले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.