समता चळवळीचा शिलेदार हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे निधन

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, ज्येष्ठ विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा खंदा शिलेदार हरपला, अशी भावना व्यक्त होत आहेत.

प्रा. हरी नरके मागील वर्षभरापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लीलावती रुग्णालयात तसेच त्यानंतर जून महिन्यात जामनगरच्या रुग्णालयात उपचार घेतले होते.

उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. आज मुंबईला येत असताना प्रवासात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नरके यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वैपुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी ठेवण्यात आले. त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नरके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी प्रमिती असा परिवार आहे.

ओबीसींच्या प्रश्नांवर हरी नरके यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवर वारंवर आवाज उठवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं विशेष राहिलं.

54 पुस्तकांचे लेखन-संपादन

डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन नरके यांनी केले होते. अभिजात मराठी, आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत 54 पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे.

अभिजात मराठीसाठी प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून नरके यांनी वेळोवेळी आवाज उठवला. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

महात्मा फुले यांच्या विचारांसाठी आयुष्य वेचले

महात्मा जोतीबा फुले यांचे विचार समाजात पोहोचवण्यासाठी हरी नरके यांनी आयुष्य वेचले. महाराष्ट्र शासनाने ‘समग्र महात्मा फुले’ नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला. त्याचे नरके संपादक होते. ‘महात्मा फुले यांची बदनामी ः एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन पुस्तके त्यांची लोकप्रिय होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात हरी नरके यांचा ंिसहाचा वाटा होता. त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती.